MaharashtraNewsUpdate : शिवरायांचा अवमान , महाविकास आघाडीकडून महामोर्चाची घोषणा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीसह सर्व विरोधी पक्षाच्यावतीने येत्या १७ डिसेंबर रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार , काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.
राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांकडून शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. फुटीरतेची बीजे येथे येथे पेरली जात आहेत. राज्यपालांना महाराष्ट्राची अस्मिता, महत्व कमी करायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत आहे. त्याविरोधात हा महामोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये सर्व विरोधी पक्षांना आणि शिवप्रेमी नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याची विनंती ठाकरे यांनी यावेळी केली आहे.
सोमवारी आगामी हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंततर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की , “राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील गाव तोडणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय.”
याचबरोबर गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवले पाहिजे. यासाठी जिजामाता उद्या ते आझाद मैदान असा हा विराट महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्यांनी येथे एकत्र यावे. महाराष्ट्र द्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केले आहे.