MaharashtraElectionUpdate : ग्राम पंचायत निवडणुकीत कोण किती पाण्यात , निकालाला प्रारंभ …
मुंबई : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल, रविवारी मतदान पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह पहिल्यांदाच थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपने १०० हुन अधिक जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीनेही ५८ जागा जिंकल्या आहेत. या निकालात काँग्रेस तिसऱ्या स्थानावर असून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये मोठी लढत होताना दिसत आहे.
राज्यातील ६०८ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. ६०८ ग्रामपंचायतींपैकी ५१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत २७६ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यानुसार भाजप आणि शिंदे गटाने १२७ जागांवर बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीने आतापर्यंत ९८ जागांवर बाजी मारली आहे. पक्षानिहाय विचार केला तर, भाजपने १०४ जागा जिंकल्या आहे. तर शिंदे गटाने २४ जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ६० जागा जिंकल्या आहे. तर काँग्रेस २३ आणि शिवसेना १७ जागा जिंकल्या आहे. इतर अपक्षांनी ४८ जागा जिंकल्या आहेत. अजूनही मतमोजणी सुरू आहे. शिरपूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायतीवर भाजपचा तर एका जागेवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे.
अकोला
अकोला जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी पार पडली. या निवडणूक निकालात शिवसेनेने बाजी मारत दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तीन ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्या आणि अपक्षांनी बाजी मारली आहे यात प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीनं बाजी मारली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सातपैकी चार महिला सरपंच; मविआला दोन तर भाजपा एका ठिकाणी विजयी.
अमरावतीत काँग्रेसची बाजी …
दरम्यान,अमरावती जिल्ह्यात ५ पैकी ३ सरपंचपदं काँग्रेसने पटकावली आहे. तर भाजपच्या वाटेला एकच जागा आली आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे, घोटा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या रुपाली राऊत आणि कवाडगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी या विजयी झाल्या आहेत. तिवसामध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेसने बाजी मारली आहे.
तर चांदुर रेल्वे तालुक्यातील चांदुरवाडी ग्रामपंचायत मध्ये भाजप आमदार प्रताप अडसळ यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी झाल्या आहेत. तसंच धारणी तालुक्यातील हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे रामेश्वर दारशिंबे विजयी झाले आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमच सरपंच पदाची निवडणूक जनतेतून झाली आहे. यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नाही.
छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेने मिळवले पहिले यश…
पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संभाजीराजे यांच्या स्वराज संघटनेने नाशिकमधील ग्रामपंचायत निवडणूक जिंकत आपले पहिले यश मिळवले आहे. आहे. नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी काल पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात ८ ग्रामपंचायतीत शिवसेना २,भाजप १, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ स्वराज्य संघटना १ असा निकाल हाती आला आहे. दरम्यान नाशिक तालुक्यात शिंदे गटाला मात्र खातही उघडता आलं नाही.
जिल्हा हिंगोली
एकुण ग्रामपंचायत-६
शिवसेना – ०२
शिंदे गट – ०२
भाजप- ००
राष्ट्रवादी- ०१
काँग्रेस- ००
इतर – ०१
जिल्हानिहाय ग्रामपंचायती..
नंदुरबार: शहादा- ७४ आणि नंदुरबार- ७५.
धुळे: शिरपूर- ३३.
जळगाव: चोपडा- ११ आणि यावल- ०२.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- ०१, संग्रामपूर- ०१, नांदुरा- ०१, चिखली- ०३ आणि लोणार- ०२.
अकोला: अकोट- ०७ आणि बाळापूर- ०१.
वाशीम: कारंजा- ०४.
अमरावती: धारणी- ०१, तिवसा- ०४, अमरावती- ०१ आणि चांदुर रेल्वे- ०१.
यवतमाळ: बाभुळगाव- ०२, कळंब- ०२, यवतमाळ- ०३, महागाव- ०१, आर्णी- ०४, घाटंजी- ०६, केळापूर- २५, राळेगाव- ११, मोरेगाव- ११ आणि झरी जामणी- ०८.
नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- ०१, मुदखेड- ०३, नायगाव (खैरगाव)- ०४, लोहा- ०५, कंधार- ०४, मुखेड- ०५, आणि देगलूर- ०१.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- ०६. परभणी: जिंतूर- ०१ आणि पालम- ०४.
नाशिक: कळवण- २२, दिंडोरी-५० आणि नाशिक- १७.
पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ०५ व भोर- ०२.
अहमदनगर: अकोले- ४५.
लातूर: अहमदपूर- ०१.
सातारा: वाई- ०१ आणि सातारा- ०८.
कोल्हापूर: कागल- ०१.