BJPNewsUpdate : १४ ऑगस्टला भाजपतर्फे फाळणी दिवस पाळणार …

नवी दिल्ली : भाजपकडून १४ ऑगस्ट रोजी देशभरात फाळणी दिवस पाळणार आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. आता दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या निमित्ताने भाजपकडून राज्यभरात मूक मोर्चा काढला जाणार आहे.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात १४ ऑगस्ट- फाळणी दिन हा “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणून पाळला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नड्डा यांनी दिली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम
भारत पाकिस्तानच्या फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या दुःखद घटनेची आठवण म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दोन कार्यक्रम करावेत. दोन कार्यक्रमांमध्ये एक मूक मिरवणूक, यात्रा तर दुसरा सभागृहात आयोजित करावा. मिरवणूक,यात्रेत बॅनर, फाळणीच्यावेळी घडलेल्या घटनांशी संबंधित फलक, राष्ट्रध्वज तिरंगा लावला जाणार आहे.
ज्या लोकांनी फाळणीमध्ये वेदना व दुःख भोगले, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या स्मरणार्थ मूक मिरवणूक, यात्रा निघेल. सभागृहात फाळणीसंबंधी माहिती व दुःखद घटनेचे स्मरण करुन देणारे चर्चा सत्राचे आयोजन केले जाणार आहे. फाळणीमध्ये ज्या कुटूंबिय किंवा व्यक्तींनी दुःख, वेदना सोसल्या त्यांचा सन्मान केला जाणार आहे. फाळणी दिनासंबंधी प्रदर्शनी लावून त्यामध्ये वृत्तपत्रामधील तसेच अन्य लेख आणि छायाचित्रे लावणे.