MaharashtraPoliticalNewsUpdate : राज्यातील सत्तांतरानंतर शरद पवारांनी आपल्या आमदारांना दिला हा संदेश …!!

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर राज्यात सध्या आलेले सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, असे भाकीत करून आपल्या आमदारांना मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी अधिक समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता गृहीत धरून पवारांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पवार यांनी मुद्दा मांडला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, आमदार उपस्थित होते.
यावेळी आपल्या आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले कि , “अडीच वर्ष उत्तमपणे कारभार चालवल्यानंतरही शिवसेनेचे नेते यांनी बंडखोरी करीत आपले सरकार पाडले. हरकत नाही. त्यांचे सरकार चार ते सहा महिन्यात पडेल. त्यांचे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहिले पाहिजे. आपल्या आमदारांची त्यादृष्टीने तयारी आवश्यक आहे”
दरम्यान आता आपल्याला विरोधी बाकावर बसायचे आहे पण त्याचवेळी सगळ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात देखील जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड अधिक समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडले तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला आत्तापासून सुरुवात करा”, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.