MaharashtraPoliticalNewsUpdate : असदुद्दीन ओवेसी यांनी आता राज ठाकरे यांच्याबाबत केली ही मागणी

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या औरंगाबादच्या बहुचर्चित सभेत केवळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मशिदीवरील भोंगे या दोनच विषयावर प्रामुख्याने टीका केली. दरम्यान त्यांच्या सभेपूर्वी ही दोन भावाचे आणि भाजपचे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुरू असलेले भांडण आहे त्यात आम्ही काय म्हणून पडायचे अशी भूमिका घेत शांत असलेले एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आता राज यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत जे भाषण केले ते हिंसेला चिथावणी देणारे होते. “एकदा होऊनच जाऊ द्या, ” असे खुले आव्हान त्यांनी दिले त्याचा अर्थ काय? एका व्यक्तीमुळे तुम्ही राज्याची शांतता पणाला लावणार आहात का?’, असा प्रश्न आता खा. ओवेसी यांनीसरकारला विचारताना ‘प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज यांना अटक करून तुरुंगात टाका म्हणजे त्यांचे डोके ठिकाणावर येईल. आपण काय बोलले पाहिजे आणि काय नाही, याचे भान त्यांना राहील’, असे म्हटले आहे.
आपल्या मुंबई ठाणे आणि औरंगाबादच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. औरंगाबादच्या सभेतही त्यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मशिदींवरील भोंगे हटवले गेले नाही तर मशिदींसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. याबाबत उद्या ते हे पक्षाची पुढील दिशा ठरवणार आहेत. या पार्श्वभूमीवर कालपर्यंत हा दोन भावांच्या वादाचा विषय आहे असे सांगणारे असदुद्दीन ओवेसी आता रमजान महिना संपताच आक्रमक झाले आहेत.
राज ठाकरे यांना अटक करा..
यावर बोलताना ओवेसी यांनी म्हटले आहे की, ‘राज ठाकरे वातावरण राज्यातील बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबादचेच उदाहरण द्यायचे झाले तर तिथे हिंदू, मुस्लिम आणि दलित बांधवांमध्ये सलोखा आहे. तो भंग करण्याचा डाव यामागे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. राज यांच्याविरुद्ध कलम १५३ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे,’ अशी मागणीही ओवेसी यांनी केली.
आमच्या मशिदींपेक्षा तुमचे मातोश्री निवासस्थान पवित्र आहे का?
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार, असे म्हटल्याने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला मग मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात? आमच्या मशिदींपेक्षा तुमचे मातोश्री निवासस्थान पवित्र आहे का?; असा सवालच ओवेसी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला.
दोन्ही भाऊ एकत्रच आहेत..
‘मुंबई तक’शी बोलताना ओवेसी पुढे म्हणाले की , राज ठाकरे यांनी आधी उत्तरभारतीयांना लक्ष्य करून राजकारणात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयोग फसल्यानंतर ते आता मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध बोलू लागले आहेत. ते कायदा हातात घेत आहेत हे स्पष्ट दिसत आहे मग तो भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्री गप्प आहात का?, यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी का बोलत नाही. त्यांचे सेक्युलर धोरण हेच आहे का, असे सवालही ओवेसी यांनी विचारले. दोघे भाऊ एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. दोन्ही भाऊ एकत्रच आहेत, असा दावाही ओवेसी यांनी केला.
खा. इम्तियाज जलील यांची टीका
दरम्यान 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा संपताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांनी सभेत केलेल्या व्यक्तव्याकडे पोलीस आयुक्त आणि राज्य शासनाचे लक्ष वेधून त्यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे आपले लक्ष असल्याचे म्हटले होते. त्यावरून पोलीस आयुक्तांनीही राज ठाकरे यांच्या सभेत त्यांना घालून दिलेल्या अटींचे पालन झाले की नाही याची चौकशी केली जात असल्याचे सांगितले होते. त्यावरून बहुतेक उद्याची ईद आणि तीन तरखेचे कार्यक्रम संपल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर कारवाई होऊ शकते असे म्हटले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे.