MaharashtraNewsUpdate : संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाली आणि सभेनंतर त्यांनी व्यक्तव्यावरून वाद निर्माण झाला नाही असे कधीही होत नाही. यावेळी औरंगाबादच्या सभेत बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून केलेल्या दाव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे . दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जातीवाद पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
“लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला असे वक्तव्य करीत त्यांनी टिळक आणि पुरंदरे यांची प्रशंसा केली होती त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे . यावर बोलताना प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे की, लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जिर्णोद्धारसाठी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला.
मुंबईत राज ठाकरे यांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया देताना प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे की , “सध्या महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीत ज्या प्रकारचे राजकारण झाले पाहिजे ते होत नाही. राज ठाकरे प्रचंड खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना शोधलेली आहे. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम समाधी शोधली, त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली.”
.. यांनी केला शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार
“यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक केले. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही पैसे जमा केले होते. परंतु १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि तो पैसा तसाच शिल्लक राहिला. त्याचा जीर्णोद्धाराला उपयोग झाला नाही.”
राज ठाकरे सर्व सभांमध्ये खोटं बोलत आहेत..
प्रविण गायकवाड पुढे म्हणाले, “न. चि. केळकर आणि त्यांचे काही सहकारी यांनी नंतर रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पुतळाबाईच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवलं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार बाजूला राहिला आणि पुतळा बाईंच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवून पुतळाबाईंचा अपमान केला. प्रथम मी त्याचा निषेध करतो. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला हा खोटा इतिहास आहे. राज ठाकरे सर्व सभांमध्ये खोटं बोलत आहेत.”
जेम्स लेनच्या पुस्तकाचा वाद काय आहे ?
“हे जेम्स लेनच्या पुस्तकाच्या पान नं. ९१ वर जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावरून जो मजकूर लिहिला त्यावरून वाद झाला. तशाच प्रकारचे लिखाण बाबासाहेब पुरंदरेंनी राजा शिवछत्रपती या पुस्तकात पान नं. १२६ वर केले आहे. येथे त्यांनी बालशिवाजी, जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांचे गोत्र एक आहे असे म्हटले आहे. ज्या हिंदू धर्मासाठी राज ठाकरे आता रस्त्यावर उतरले आहेत त्या हिंदू धर्मात आई, वडील आणि मुलाचं गोत्र एक असते ,” असेही गायकवाड यांनी नमूद केले. तसेच “जेम्स लेनच्या पुस्तकाचं पान नं. ९१ आणि पुरंदरेंच्या पुस्तकाचं पान नं १२६ तपासून पाहिलं तर जेम्स लेन दोषी आहे का नाही हे नंतर ठरवता येईल, पण बाबासाहेब पुरंदरेंनी जे लिखाण केलंय त्यात दादाजी कोंडदेव यांना सह्याद्री म्हटले. संस्कृतचे पंडीत असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी धर्मशास्त्रावर ४० पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी पुरंदरेंच्या बखरीतील आक्षेपार्ह गोष्टींवर लिहिले आहे.”
दरम्यान , ‘शिवभारत’ हे जयराम परमानंद यांनी शिवाजी महाराजांच्या दरबारात लिहिलेलंले पुस्तक आहे. त्यात दादोजी कोंडदेव किंवा रामदास स्वामी यांचे एकदाही नाव आलेले नाही,” असेही त्यांनी नमूद केले.