IndiaNewsUpdate : किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात गेले तब्ब्ल ४३५० कोटी….
नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची थोडी थोडकी नव्हे तर तब्ब्ल ४३५० कोटी रुपये रुपयांची रक्कम अनेक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान सरकारला हि माहिती मिळताच या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेली रक्कम वसूल करण्याची कार्यवाही केंद्राने सुरु केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार यासंबंधी केंद्र सरकारने काही नियम आखले आहेत. दरम्यान पीटीआयच्या एका वृत्तानुसार, यानंतरही जवळपास ४३५० कोटी रुपये अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये असे अनेक शेतकरीदेखील आहेत जे आयकर भरतात आणि सोबतच सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात.
दरम्यान केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. २००० प्रमाणे तीन हफ्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. हे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून आर्थिक मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची यादी तयार केली जाते.
या योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंब म्हणजे यामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. जास्त उत्पन्न असलेल्या शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतात मात्र अशा अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्ब्ल ४३५० कोटी रुपये जमा झाले आहेत त्याची वसुली करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत. जे लाभधारक या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी त्यांच्या खात्यावर आलेली रक्कम सरकारला परत करण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ‘रिफंड पर्याय’ वर क्लिक करून त्यांच्या खात्यातील रक्कम परत करू शकतात असे म्हटले आहे.