MaharashtraPoliticalUpdate : ईडीने जे केले ते योग्यच केले , मालिकांचा राजीनामा घ्या : देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचे समर्थन केले असून “देशाच्या गद्दारांसोबत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी जमीन खरेदी व्यवहार केला आहे. ईडीने केलेली कारवाई नियमानुसारच आहे. मलिकांनी अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचे ईडीकडे पुरावे आहेत. सरकारने आढेवेढे न घेता मलिकांचा राजीनामा त्वरित घ्यावा. नवाब मलिक यांनी देशाच्या गद्दारांसोबत केलेला जमिनीचा व्यवहार गंभीर आहे. ईडी आणि एनआयएनं गेल्या काही दिवसांमध्ये जॉईंट ऑपरेशन केली आहेत. या प्रकरणी ईडीने ९ ठिकाणी सर्च ऑपरेशन केले . त्यातून अनेक लिंक्स बाहेर आलेल्या आहेत. त्यातील एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. नवाब मलिक यांनी ज्या सरदार वली खान आणि सरदार पटेल यांच्याकडून जमीन घेतली तो हसीना पारकरचा फ्रंटमॅन आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अतिक्रमण काढण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी मागण्यात आली आणि नंतर बदण्यात आली. २५ लाख रुपयांचा सौदा झाला पण एकही रुपया पुढे देण्यात आले नाही. हसीना पारकरला ५५ लाख रुपये देण्यात आले याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीनं नवाब मलिकांना मिळाली. तसेच ते पैसे अंडरवर्ल्डला गेले, ते पैसे हसीना पारकर आणि दाऊदला मिळाले, असा दावा करून फडणवीस म्हणाले कि , एखाद्या मंत्र्यांनं मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन विकत घेण्याचे कारण काय? मोठी गोष्ट ही आहे की हा व्यवहार झाल्यानंतर मुंबईत तीन वेळा दहशतवादी हल्ले झाले आहेत. मुंबईत जे हल्ले करतात, त्यांना आपण पैसे देणार असू तर ते निंदनीय आहे. म्हणून मी म्हणतोय की ईडीनं केलेली कारवाई नियमानुसारच आहे.
राजीनामा घेतलाच पाहिजे
मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन घेतली जात असेल तर त्याचा राजकीय पक्षाने राजीनामा घेतला पाहिजे. तसेच राजीनामा घेणार नाही, असे जर महाविकास आघाडीचे नेते म्हणत असतील तर मात्र देशात हा चुकीचा संदेश जाईल, जो नक्कीच चांगला नसेल. या प्रकरणात टेरर फंडिंग अँगल स्पष्टपणे दिसतोय. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे. देशाच्या सुरक्षिततेसंबंधी महत्त्वाचं प्रकरण आहे. कुठल्याही राजकीय पक्षानं राजकारण करु नये. ईडीला पुढील कारवाई करु द्यावी, असेही फडणवीस म्हणाले.