CoronaIndiaUpdate : ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे देशात नव्या वर्षात कोरोनाची तिसरी लाट , पण….

नवी दिल्ली : भारतात ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे २०२२ च्या सुरुवातीलाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू असू शकतो. सध्या भारतात दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या ७,५०० पर्यंत गेली आहे . मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टाची जागा घेतल्यानंतर हा आकडा आणखी वाढून भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीच्या सदस्याने याबाबत माहिती दिली. मात्र तिसऱ्या कोरोना लाटेत दुसऱ्या लाटेइतके अधिक रूग्ण आढळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही पण नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.
याबाबत बोलताना नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले कि , भारतात ओमायक्रॉनची तिसरी लाट येऊ येऊ शकते, पण ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. ही तिसरी लाट फेब्रुवारी २०२२ मध्ये येण्याची शक्यता आहे. देशभरातील नागरिकांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ही लाट सौम्य असेल. सध्या भारतात दररोज जवळपास साडेसात हजार नवे रूग्ण आढळत आहेत. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टा विषाणूची जागा घेण्यास सुरुवात केल्यानंतर नव्या रूग्णांची संख्या वाढू शकते.
दरम्यान सेरो सर्वेक्षणानुसार आता डेल्टा विषाणूच्या संपर्कात आले नाहीत असे खूप कमी लोक आहेत. सध्या नागरिकांमध्ये ७५ ते ८० टक्के लोक डेल्टाच्या संपर्कात येऊन त्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे. याशिवाय ८५ टक्के प्रौढांना करोनाचा एक डोस, तर ५५ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. यामुळे खूप कमी लोक आता विषाणूच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यामुळेच तिसऱ्या करोना लाटेत दुसऱ्या लाटेइतके अधिक रूग्ण आढळणार नाहीत, याशिवाय आपण आरोग्य यंत्रणाही तयार केल्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करणं फारसं अवघड जाणार नाही, असेही विद्यासागर यांनी म्हटले आहे.