MaharashtraPoliticalUpdate : महापालिकेत खेळ करताय ? तीन आमदार किंवा खासदारांचा एक प्रभाग करणार का? , राज ठाकरे यांचा संताप

नाशिक : महापालिकांच्या प्रभाग रचनेच्या राज्य शासनाच्या निर्णयावर मनसेचे नेते राज ठाकरे चांगलेच खवळले. या विषयावर आपली तीव्र प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि , स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार का?. मुळात अशी कोणतीही पद्धत देशात कुठेही नाही. सगळीकडे खासदारकी, आमदारकी, पालिका, ग्रामपंचायतीपर्यंत एकच उमेदवार हीच पद्धत आहे. महाराष्ट्रात हे कुठून सुरू झाले आणि का याचे एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्यातून आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करणे आणि पैसा ओतून निवडणूक जिंकणे. पण याचा त्रास लोकांना का? एका उमेदवाराला मत देण्याऐवजी तीन उमेदवारांना लोकांनी का मत द्यायचं? जनतेला गृहीत धरायचे , हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी. महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? हा कसला खेळ चालू आहे? उद्या तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का?.
राज्य सरकारने राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नव्या प्रभाग रचनेवर टीका केली. दरम्यान, अशा प्रकारे प्रभागरचना वारंवार बदलून निवडणुका मॅनेज होत असतात, असा आरोप करून ते म्हणाले कि , यातून निवडणुका मॅनेज होतात. आधी एकचा प्रभाग पुन्हा चारचा का केला. चारचा होता, तो परत तीनचा का केला? गेल्या १० वर्षांतला हा खेळ सुरू आहे आणि आपण उघड डोळ्यांनी बघत राहायचं?”.
यासंदर्भात राज्य सरकारवर टीका करतानाच नागरिकांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले कि , माझी जनतेला विनंती आहे की लोकांनी कोर्टात, निवडणूक आयोगाकडे जायला हवे . कोणताही नगरसेवक दुसऱ्याला काम करू देत नाही. एकाने प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो. उद्या लोकांना नगरसेवकाला भेटायचे असेल, तर त्यांनी कोणत्या नगरसेवकाला भेटायचे ? निवडणुकीची थट्टा करून ठेवली आहे यांनी आणि जनता त्यावर काही बोलत नाही. आम्ही न्यायालयात गेलो तर त्याला राजकीय वास येतो . या विषयी ५ वर्षांपूर्वीही मी बोललो होतो. २०१२ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होते, तोपर्यंत एकाच उमेदवाराची व्यवस्था होती. तेव्हा त्यांनी २ उमेदवारांच्या प्रभागाची रचना केली. त्यानंतर भाजपाने ४ उमदवारांचा प्रभाग केला. आता हे सरकार आल्यावर त्यांनी आधी एक प्रभागाची रचना आणली. निवडणूक आयोगानेही एकाच उमेदवाराचा प्रभाग करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काल यांनी पुन्हा ३ उमेदवारांचे प्रभाग आणले.