MaharashtraNewsUpdate : गडकरींच्या आरोपांमधील तथ्य तपासून पाहावे लागेल : अजित पवार

मुंबई : “राज्यात महामार्गांच्या कामात शिवसेना कार्यकर्ते अडथळे आणत आहेत”, अशी तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून अशा परिस्थितीत राज्यातील कामे करावीत की नाही, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे या तक्रारीत म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना गडकरींच्या आरोपांमधील तथ्य तपासून पाहावे लागेल असे म्हटले आहे.
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, रस्त्यांच्या कामात शिवसैनिक अडथळा आणत त्यावर ते म्हणाले की, मी काल बातमी वाचली आहे. तो आरोप असून त्यामध्ये तथ्य आहे की नाही ते तपासून पाहण्याची गरज आहे. मागील ३० वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात काम करीत आहे. त्या दरम्यान नेहमी सांगत आलो आहे की, हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी पदाचा गैरवापर करणाऱ्यांना देखील सुनावले आहे. “जर ठेकेदार चांगल काम करत असेल आणि काही जण राजकिय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करून जर कोणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबविला गेला पाहिजे”, असे अजित पवार म्हणाले.
विकास कामात कोणीही अडथळा आणू नये
अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीचं देखील यावेळी कौतुक केलं. “आता थेट मुख्यमंत्र्यांना नितीन गडकरींनी पत्र लिहिले. पण मी गेली पावणेदोन वर्ष मुख्यमंत्र्यांसोबत काम करीत आहे. त्या दरम्यान अनेक उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांवेळी त्यांचे एकच सांगणे असते. कामाचा दर्जा चांगला ठेवा हा कटाक्ष त्यांचा असतो. जेव्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक होते. तेव्हा पर्यावरण, कामाचा दर्जा, विकास कामादरम्यान वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकरणी ते लक्ष घालतील आणि शहानिशा करतील, याबद्दल मला १०० टक्के खात्री आहे. त्यामधून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होईल. कुठल्या कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने किंवा नागरिकाने विकास कामात अडथळा आणता कामा नये”, अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.