MaharashtraNewsUpdate : राज्य सरकार देणार राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने खेलरत्न पुरस्काराला असलेले राजीव गांधी यांचे नाव बदलून हॉकीतील जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव दिल्याचा वाद चालू असतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजे २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे.
राज्य सरकारच्या वतीने राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी केला असला तरी हा निर्णय ७ जुलै २०२१ रोजी माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर अधुनिकीकरणाचा केंद्र बिंदू आहे. राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व परिणामकारक वापर करण्यावर भर दिला होता. म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी या क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा, असा निर्णय बैठकीत झाल्याचे म्हटले आहे.
या निर्णयानुसार आता राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या विभागावर आर्थिक भार पडणार नाही, अशा पद्धतीचा हा पुरस्कार असावा, असेही म्हटले आहे.
या पुरस्काराची निवड आणि नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी २० ऑगस्ट रोजी या पुरस्काराची घोषणा करावी. त्यासाठीची निवड प्रक्रिया सुरू करून ३० ऑक्टोबर पूर्वी निकष ठरविणे, निवड करणे वगैरे प्रक्रिया पार पाडून पुरस्कार देण्यात यावा. यापुढे दरवर्षी २० ऑगस्ट या राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनीच हा पुरस्कार देण्यात यावा, असेही परिपत्रकात म्हटले आहे.