MaharashtraNewsUpdate : कोरोनाच्या तिसरी लाट कशी थोपवता येईल ? यावर राजेश टोपे यांचे उत्तर

मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात तिसरी लाट येऊ शकते पण ती कधी येईल, हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण कोरोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला करोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण सुद्धा रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश टोपे म्हणाले कि , “आयएमसीआरने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. आयएमसीआरने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल, या संदर्भात सूचना द्याव्यात. कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सूचना राज्याला दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियम पाळत आहोत. आयएमसीआरने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल.”
दरम्यान महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. मात्र त्यासाठी गतीने लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. जर ६० ते ७० टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची आहे. आपण राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सूट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत आहोत. मात्र एवढ्या गर्दीत रेल्वे प्रवाशांची तपासणी होणे अद्याप शक्य नसल्याने लोकलबाबत निर्णय झालेला नसेल. पण दोन लस घेतल्या असतील तर अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत. या विचारांच्या बाबतीत कोणाचेही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स लोकल रेल्वेबाबत योग्य निर्णय घेतील, अशी आशा असल्याचे राजेश टोपे म्हणाले.