IndiaNewsUpdate : ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही, मोदी सरकारच्या उत्तराने विरोधी पक्ष आक्रमक

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी देशातील कोणाचाही मृत्यू झाला नाही असा अहवाल राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिला असल्याचे केंद्र सरकारने संसदेत जाहीर केल्यामुळे सर्वत्र टीका होत आहे. मंगळवारी संसदेत विरोधी पक्षांने विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे ही केंद्र सरकारने सांगितले.
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण रस्त्यांवर आणि रुग्णालयात मृत पावले का ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना सांगितले की, “आरोग्य हा राज्यांच्या अख्यत्यारितील विषय आहे. केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेल्या मृतांच्या आकडेवारीची माहिती देण्यासाठी सांगितले होते . त्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण मृत पावला असे कोणत्याही राज्याच्या आणि केंद्र शासित प्रदेशाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले नाही.” दरम्यान “कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ही ३०९५ मेट्रिक टन इतकी होती. ती दुसऱ्या लाटेत ९००० मेट्रिक टन इतकी झाल्याचं केंद्र सरकारने सांगितले.
दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र होते . त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अनेकांना तर हॉस्पिटलमध्ये बेडही उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यांनी रस्त्यावरच आपला जीव सोडला. असे असताना केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही असे उत्तर दिल्याने विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. ऑक्सिजन अभावी देशात हजारो मृत्यू झाले असून ज्या लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे त्यांनी केंद्र सरकारवर खटला दाखल करावा असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.