CoronaNewsUpdate : कोरोनाबाधितांच्या सुधारणेचा दर ९७ टक्क्यांवर , देशात सक्रिय रुग्ण साडेचार लाख

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने नुकतीच गेल्या २४ तासातली आकडेवारी जाहीर केली आहे. यावरुन हे लक्षात येत आहे की देशातल्या करोना रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात ३९ हजार ६४९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर सध्या देशात ४ लाख ५० हजार ८९९ रुग्ण उपचार घेत आहेत.
काल दिवसभरात देशात ३७ हजार १५४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यापैकी केरळमध्ये १२ हजार २२० रुग्ण आढळून आले तर महाराष्ट्रात ८ हजार ५३५ रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातल्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही २००० ने वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता केरळहूनही अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
India reports 37,154 new cases in last 24 hours; active caseload at 4,50,899. Recovery rate increases to 97.22% pic.twitter.com/m4uTvMGjQC
— ANI (@ANI) July 12, 2021
७२४ कोरोना रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासात देशातल्या ७२४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ४ लाखांच्याही वर गेली आहे. देशात आत्तापर्यंत ४ लाख ८ हजार ७६४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
करोना प्रतिबंधक लसीकरण….
काल दिवसभरात देशातल्या १२ लाख ३५ हजार २८७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी ७ लाख ८६ हजार ४७९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४ लाख ४८ हजार ८०८ इतकी आहे. त्यामुळे आता देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ३७ कोटी ७३ लाख ५२ हजार ५०१ वर पोहोचली आहे.
केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
दरम्यान कोरोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही अद्याप महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचे चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे केरळमध्ये १ लाख २८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत महाराष्ट्र आणि केरळ पुन्हा एकदा देशातील एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा असणारी राज्यं झाली आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र आणि केरळचा ५३ टक्के वाटा आहे.
दिल्लीत परिस्थिती नियंत्रणात
विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांच्या पुढे गेलेल्या दिल्लीत परिस्थिती नियंत्रणात आली आहे. १ ते १० जुलै दरम्यान दिल्लीत फक्त ८१७ नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या दोन आकडी आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील डॉक्टरांनी कोल्हापूरमधील परिस्थिती चिंताजनक होत असून कोल्हापुरात दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. कोल्हापुरात सर्वाधिक लसीकरण झाले असले तरी दैनंदिन रुग्णसंख्येतही कोल्हापूरच पहिल्या क्रमांकावर असल्याचे वृत्त आहे. याशिवाय महाराष्ट्रात एकूण आठ जिल्ह्यांमधील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे.