Maharashtra assembly session Live : खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याचा फडणवीसांचा आरोप

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. या गोंधळात सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, दरम्यान अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या गोंधळामुळे भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
सभागृहातून सभात्याग करून विधानभवनाबाहेर येऊन माध्यमांशी बोलाताना फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पाडलं. आम्ही हे सरकार अपयशी ठरले हे दाखवून दिले. सरकारने खोटे आरोप लावून १२ आमदारांना निलंबित केले आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार.
आत्तापर्यंत नेहमीच असे प्रकार घडले परंतु कुणी कधी निलंबित झाले नाही. एकाही भाजपाच्या सदस्याने शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सगळ्यांनी बघितले आहे. ते शिवसेनेचे सदस्य होते त्यांनी धक्काबुक्की केली. आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्याशी सर्वांच्यावतीने क्षमा मागितली व तो विषय संपवून बाहेर आलो. पण आमच्या आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी रचण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.