MarathaAndolanUpdate : मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी एक महिन्याचा वेळ : खा. संभाजीराजे

नाशिक : राज्य सरकारने बहुतेक मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी सरकारने २१ दिवस मागितले आहेत. मात्र आम्ही त्यांना एका महिन्याचा वेळ देतो, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केली आहे. मराठा समन्वयकांची बैठक पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशाही जाहीर केली.
खा. संभाजी राजे म्हणाले कि , राज्य सरकारने समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. समाजासाठी काही हजार कोटींची जी मागणी केली होती,त्याच्या पूर्ततेसाठी सरकारला २१ दिवसांचा वेळ देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते म्हणाले की, मराठा समाज खूश होईल एवढी रक्कम आम्ही २१ दिवसांत जाहीर करु. तेवढा वेळ द्या, असे आवाहन पवारांनी केल्यामुळे आम्ही त्यांना महिन्याभराचा वेळ द्यायचे ठरवले आहे, असे संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केले.
दरम्यान मग आता मूक आंदोलन स्थगित झाले असे म्हणावे का असा सवाल उपस्थित केला तेंव्हा खा. संभाजीराजे म्हणाले की, आंदोलन संपलेले नाही, संपणार नाही. या काळात कार्यकर्त्यांच्या समन्वयकांच्या बैठका होतील. मात्र, काही काळ आंदोलन थांबले असे म्हणण्यास हरकत नाही. यावेळी त्यांनी सरकारने मान्य केलेल्या अनेक मागण्यांविषयीही सांगितले. सारथी संस्थेचे उपकेंद्र कोल्हापूरात उभारणार, वसतिगृह किंवा त्यामध्ये जागा समाजाला मिळवून देणार अशा बऱ्याच मागण्या ठाकरे सरकारने मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्यांसाठी सरकारने आमच्याकडे वेळ मागितलेला आहे. त्यामुळे आम्ही तो त्यांना देत आहोत, असे संभाजीराजे म्हणाले.
या भाषणात त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे काही पर्याय सुचवले. पुनर्विचार याचिका दाखल करणे, तसंच मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत प्रश्न पोचवणे आणि किमान राज्य सरकारच्या हातात जे आहे, ते तरी प्रश्न मार्गी लावणे हे ते पर्याय आहेत.