MartahaAndolanUpdate : केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेले : प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : खा . संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या आंदोलनाला उपस्थिती लावून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हजेरी लावून मोठा धक्का दिला. या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं. त्याला दोन्ही सरकारे दोषी आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
कोल्हापुरात शाहू महाराजांच्या स्मृतिस्थळासमोर आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा पार पडला. प्रकाश आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना हा आरोप केला. दोराय स्वामींचं जजमेंट आहे. त्याला रिव्हिजीट करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली पाहिजे, असे सांगतानाच मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यास केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत आहे. दोन्ही सरकारांनी वेळीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न उद्भवला, असे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असा आहे. मी ही भूमिका घेतली होती. ती पटवून देण्याचा प्रयत्नही केला होता. आता ही भूमिका सगळ्यांना पटत आहे. ही चांगली गोष्ट आहे, मराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने आधीपासूनच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता तरी मराठा आरक्षणासाठी जे जे पर्याय आहेत, त्याचा अवलंब केला पाहिजे. आजच्या मराठा आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहेच. शिवाय ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्नही सरकारने सोडवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.