KolhapurNewsUpdate : अजित पवारांच्या भेटीनंतर काय बोलले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ?

कोल्हापूर : खा . छत्रपती संभाजी राजे पुण्यात खा. उदयनराजे यांची भेट घेत असताना तिकडे कोल्हापुरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस मध्ये जाऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. बैठकीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगून कायद्याचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले कि , आमच्यात सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली असून अजित पवार यासंबंधी सविस्तर सांगतील. तसेच समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगलं करता येईल ते करा असे मार्गदर्शन आपण त्यांना केले आहे . सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही.
“केंद्र सरकारने जर येथे लक्ष दिले आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचे पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितलं पाहिजे. कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही,” असे सांगून मराठ्यांसाठी जास्तीत करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. “मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं. “सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणे गरजेचे आहे. त्याचे मराठीत भाषांतर करुन विषय समजून घेतला पाहिजे. तसेच कोर्टाचा अवमान होता कामा नये,” असेही ते म्हणाले.