योग्य वेळ आल्यास ताकद दाखवीन… छत्रपती संभाजीराजे यांचे नारायण राणे यांना प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. ते राज्यभर दौरा करून अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या पाठोपाठच अनेक संघटना देखील आता आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपा नेते नारायण राणे यांनी या संभाजीराजेंवर या मुद्यावरून टिप्पणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी ट्विटद्वारे नारायण राणे यांच्या टीकेला योग्य वेळ आल्यावर ताकद दाखवू असे प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या ट्विट मध्ये संभाजी राजे यांनी म्हटले आहे कि , “छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल, तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.”
दरम्यान “छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजलं असतं तर मी स्वागत केलं असतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला. राजांना रयत भेटायला येते हे का फिरतायत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना काल केली होती.