NewsInTrending : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा गुंता सुटला , संशयाची सुई सचिन वाझेकडेच !!
मुंबई । राज्यात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असताना, आता दुसरीकडे एटीएसला मोठं यश मिळाले असल्याचा दावा राज्याचे एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट वरून केला आहे. आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे कि, अतिसंवेदनशील मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. मी आपल्या संपूर्ण एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सॅल्यूट करतो, ज्यांनी मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र एक करून, या प्रकरणाचा न्यायपूर्णरित्या छडा लावला. ही केस माझ्या करिअरमधील आतापर्यंतच्या सर्वात कठीण केस पैकी एक होती.
दरम्यान हिरेन हत्या प्रकरणात निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना एटीएसने अटक केली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले आणि त्यांचाच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगले वळण मिळाले. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत. कोर्टात एटीएसने तब्बल ४ पानांचा अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे.