MaharashtraAssemblyUpdate : अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू… !!

मुंबई : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या हिताचे काही महत्वाचे निर्णय घेऊन सर्वपक्षीय आमदारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे .
यापैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे कोरोना काळात कपात करण्यात आलेले आमदारांचे ३० टक्के वेतन वेतन येत्या १ मार्चपासून पुन्हा पूर्ववत केले जाणार आहे. तर आमदार निधीतही १ कोटीची वाढ केली आहे . अजित पवारांनी विधानसभेत हि घोषणा करताच आपला विरोध विसरून सर्वपक्षीय आमदारांनी अर्थमंत्री अजित पवारांच्या या घोषणेला मनापासून दाद दिली.
विधानसभेत पुरवणी मागण्या मांडताना अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याच्या घोषणेचा देखील समावेश होता. “१ मार्चपासून सर्व आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षभर आमदारांच्या एकूण वेतनातून ३० टक्के वेतन केले जात होते. करोना काळात या प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हे वेतन पूर्ववत केलं जाईल”, असे अजित पवारांनी जाहीर केले . त्याचबरोबर आमदार निधीमध्ये देखील वाढ केल्याचेही जाहीर केले. “कोरोना काळात स्थानिक विकास निधीला कट लावलेला नाही. शेवटच्या काळात ३ कोटी रुपये आमदार निधीदेखील सगळ्यांना देण्याची सोय केली. सरकार कुणाचे ही असले , तरी आमदार निधी सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी करोनाचं संकट असले , तरी आमदार निधी ४ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये जातील, मात्र, त्याची तरतूद केली जाईल”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान आमदारांसाठीच्या गाडीचा मुद्दा यावेळी काही आमदारांनी मांडला होता. त्यावर मिश्किलपणे उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “गाडीसाठी जे करायचंय ते फाईलवर करतो, उगीच सगळ्या महाराष्ट्राला नको कळायला. ड्रायव्हरच्या मागणीवर देखील चर्चा करून ती मान्य केली जाईल!” त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी आमदारांसाठी या महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.