GoodNews : आता बिनधास्त बांधा १५०० स्क्वेअर फुटापर्यंतचे घर , परवानगीची गरज नाही

औरंगाबाद | राज्यात 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी कसल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही, अशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि , शहरातील ’31 डिसेंबर 2020 पर्यंतची सर्व बांधकामं नियमित होतील. त्याचबरोबर येथून पुढे जर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचे असले तर महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही.’ नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक छोट्या ग्राहकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे. याचा फायदा राज्यातील 55 हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त 3 हजार स्क्वेअर फूटपर्यंत घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी त्यांनी म्हटले आहे.
याव्यतिरिक्त, राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल प्रकरणीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात सध्या वीजबिल थकीत केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज खंडित करण्यात आले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान या पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले कि , या घटनेची संपूर्ण माहिती मला नाही. त्यामुळे पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच याबाबत बोलेल . पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण सध्या राज्यात गाजत असून याप्रकरणात शिवसेनेच्या संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. हा मुद्दा संवेदनशील असून यावर आताच काही विधान करणे उचित ठरणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.