मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत

त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी सुरु करण्याचे सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. मात्र महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यत विचार होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत. अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यभरातील विद्यापीठे त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला होता. विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील यावर निर्णय घेऊ असे सांगण्यात आले आहे.
कोरोनाची नेमकी परिस्थिती कशी आहे? याचा आढावा, सर्व्हेक्षण करून स्थानिक प्रशासन महाविद्यालय सुरू करण्याबाबत सूचना देईल, असे या पत्रात आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वसई विरार, पनवेल , पालघर या क्षेत्रात महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परावनगी दिल्यानंतर या भागातील महाविद्यालय उद्या राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करत सुरू होणार आहेत. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालय सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती आहे. राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु, विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती बंधनकारक नाही असे उदय सामंत म्हणाले.
राज्य शासनाच्या 3 फेब्रुवारीपासून कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयात प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनशी विचारविनिमय करून त्या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन विद्यापीठाने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. असे असताना देखील मुंबई विद्यापीठाने कॉलेज महाविद्यालय सुरू करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकात ही जबाबदारी त्या त्या भागातील कॉलेज, शैक्षणिक संस्थांवर सोडली असल्याचे समोर आले आहे. याबाबत बुक्टोने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले होते.