AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या पर्यटकांना केळघर घाटात अपघात , १ ठार ४ जखमी

औरंगाबादवरून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकांच्या कारला केळघर घाटात भीषण अपघात झाला. कार (एमएच 20-सीएस 9787) पूलावरून थेट नदी पात्रात कोसळली. बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात कारचालक जागेवरच ठार झाला. कारमधील इतर चार प्रवासी चमत्कारीत रित्या बचावले आहेत. अमित जोशी (वय-42, रा.औरंगाबाद) असं मृत तरुणाचं नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नाताळाच्या सुट्टीनिमित्त औरंगाबादहून पाच पर्यटक महाबळेश्वरला फिरायला आले होते. फिरून झाल्यांनतर ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी आंबेघर येथील वेण्णा नदीवरील पूलावरून थेट खाली कोसळली. चालक अमित जोशी यानं गाडीतून उडी मारली मात्र दुर्दैवानं त्याचा गाडीखाली दबून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान कारमधील इतर पर्यटक यशराज पाटील (वय-18), समरजीत बछिरे (वय-17), संकेत पाटील (वय-16) व आयुष शेडगे (वय-17, सर्व रा. औरंगाबाद) हे सर्व जण अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी मेढा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृत कारचालक अमित जोशी यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.