MumbaiNewsUpdate : मुंबईकरांसाठी रात्रीची संचारबंदी अंशतः शिथिल , चारपेक्षा अधिक जण एकत्र जमल्यासच होईल कारवाई

मुंबईसह राज्यभरात महापालिका क्षेत्रांत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली असली तरी मुंबईसाठी ही संचारबंदी अंशतः सौम्य असल्याने नाताळ आणि नव्या वर्षाच्या तयारीसाठी मर्यादित संख्येत घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात अली आहे. परंतु, गर्दी जमवू नका असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. चारपेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुंबई पोलिसांनी म्हटले आहे कि , कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच हा विषाणू नवनवीन रूपं धारण करीत आहे. त्यामुळे खबरदारी बाळगावी लागणार आहे. २५ तारखेला येणारा नाताळचा सण आणि नववर्षाच्या स्वागताला पार्ट्यांचे आयोजन केले जाते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक एकत्र येतात. यातून संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने राज्यात पालिका क्षेत्रांत ५ जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान यामुळे नोकरदार, सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये संभ्रम असल्याने मुंबई पोलिसांनी ही नियमावली नेमकी काय आहे, याबाबत स्पष्टता केली आहे.
सरकारने लावलेली संचारबंदी ही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. रात्रपाळीची कार्यालये वगळता पब, हॉटेल्स, सिनेमागृह अशी करमणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना रात्री ११ वाजता बंद करणे बंधनकारक असल्याचे नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.
संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिक एकटेदुकटे घराबाहेर पडू शकतात. दुचाकी किंवा कारने प्रवासही करता येऊ शकतो. मात्र यामध्येही चारपेक्षा अधिक व्यक्ती नको, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे. सरकार, पोलिस तसेच इतर यंत्रणांच्या वतीने घेतले जाणारे निर्णय, निर्बंध सर्वांसाठी फायद्याचे असल्याने शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले आहे.