IndiaCoronaEffect : केंद्र सरकारकडून ३१ डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

जगभरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. कोरोना संसर्गामुळे देशात २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंधनं आणली आहेत. १६ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडं मात्र लक्ष लागून आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी भारताने काही देशांशी हवाई करार केले आहेत. त्याला एअर ब्रीज किंवा एअर बबल असं म्हटलं जातं. केनिया, भूतान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युएई, कतार, नायजेरिया, मालदीव, जपान, इराक, जर्मनी इत्यादी अनेक देशांसह भारताने एअर बबल करार केले आहेत. दोन देशांमधील हवाई बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे प्रतिबंधात्मक परिस्थितीत त्यांच्या एअरलाइन्सद्वारे एकमेकांच्या प्रदेशात ऑपरेट करता येऊ शकते.