IndiaCoronaUpdate : जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती
गेल्या २४ तासांत ३७ हजार ९७५ कोरोनारुग्णांची नोंद होऊन एकूण रुग्णांचा आकडा जवळपास ९२ लाखांच्या आसपास पोहचला आहे. यापैकी जवळपास ८६ लाख ०४ हजार ९५५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी सकाळी ८.०० वाजता जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील संक्रमणाचा एकूण आकडा ९१ लाख ७७ हजार ८४० वर पोहचला आहे.
दरम्यान गेल्या २४ तासांत ४८० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यानंतर मृतांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार २१८ वर पोहचली आहे. आकडेवारीनुसार, देशात सध्या ४ लाख ३८ हजार ६६७ जणांवर उपचार सुरू आहेत. अॅक्टिव्ह केसेसचा दर ४.७७ टक्क्यांवर आहे. तर देशात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर ९३.७५ टक्क्यांवर आहे. करोना मृत्यू दरर १.४६ टक्के नोंदवण्यात आला आहे. भारतात ७ ऑगस्ट रोजी संक्रमितांच्या संख्येनं २० लाख, २३ ऑगस्ट रोजी ३० लाख तर ५ सप्टेंबर रोजी ४० लाखांचा आकडा ओलांडलेला दिसला होता. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी ५० लाख, २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख आणि २० नोव्हेंबर रोजी ९० लाखांचा आकडा करोनारुग्णांच्या संख्येनं ओलांडलाय.
आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरपर्यंत एकूण १३.३६ कोटींहून अधिक नमुन्यांची करोना चाचणी पार पडली आहे. यातील १० लाख ९९ हजार ५४५ नमुन्यांची चाचणी केवळ सोमवारी करण्यात आली. शेतकचरा जाळल्यामुळे झालेल्या प्रदूषणात वाढ होऊन राजधानी दिल्लीतील करोनारुग्णांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचं मत दिल्लीचं आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी सोमवारी व्यक्त केलं. दोन-तीन आठवड्यांत परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या चार राज्यांत वेगाने फैलावत चाललेल्या करोनाविषयी अतिशय गंभीर चिंता व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने चारही राज्यांना दोन दिवसांच्या आत स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.