MaharashtraNewsUpdate : ….आणि म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांच्या दिवाळीची बातमी झाली !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केल्याच्या बातम्या गाजत असतानाच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन पोलीस जवानांचा जवानांचा आनंद द्विगुणित केला आहे. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्माी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
दरम्यान दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदाच गृहमंत्री गडचिरोली इथे येत असल्याने पोलीसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलीसांशी संवाद साधला असून त्यांच्यासोबत फराळही केला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. तसंच, त्यांच्या घरांना भेटी देत कुटुंबियांशी संवाद साधत लहान मुलांसमवेत गप्पा गोष्टी केल्या. या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना गृहमंत्री म्हणाले कि , ‘भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापसून, आपल्या आई-वडलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी तुमच्यात यायला हवं. माझं पोलिस दल ड्युटीवर असताना मी माझ्या घरात, माझ्या पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरी करत बसलो असतो तर माझ्या मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्याकडं यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुख यांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून तीनशे किलोमीटर अंतरावर छत्तीसगढ सीमेलगत इंद्रावती नदीकाठी पातागुडम पोलीस चौकी आहे. देशातील सर्वात दुर्गम चौकी मानली जाते.