IndiaNewsUpdate : अरे रे हे काय झाले ? एकाच कुटुंबातील पाच जणांनी घेतला गळफास !!
आसामच्या कोक्राझार येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सोमवारी घडली असल्याचे वृत्त आहे. आर्थिक चणचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आसाम-पश्चिम बंगालच्या सीमेवरील तुलसीबिल शहरातील एका घरात पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. निर्मल पाल (वय ४५), पत्नी मल्लिका (वय ४०), मुलगी पूजा (वय २५), नेहा (१७) आणि दीपा (१५) अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश रोशन यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट होत आहे. निर्मल पाल यांचे तुलसीबिल मार्केटमध्ये एलपीजीचे स्टोअर होते. त्यांच्यावर २५ ते ३० लाखांचे कर्ज होते. त्याची मोठी मुलगी एका खासगी शाळेत शिक्षिका होती. घरात एक सुसाइड नोट सापडली आहे. मात्र, त्यातील मजकूर समजू शकला नाही. मार्केटमधील काही व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाल यांनी एलपीजी कनेक्शन जोडण्याचे आश्वासन देऊन अनेक लोकांकडून मोठी रक्कम घेतली होती. मात्र, ते आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. दुसरीकडे, पाल यांची आत्महत्या नसून, त्याच्याविरोधात कट रचला गेला. या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.