MaharashtraEducationNewsUpdate : घाबरू नका , ज्यांना परीक्षा देता आल्या नाहीत त्यांना सरकार देत आहे पुनश्च संधी : उदय सामंत

राज्यातील जे विद्यार्थी कोरोना, महापुराची संकट आणि ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ यामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. अशा विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेवरून काळजी वाढली होती. अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही १० नोव्हेंबरपूर्वी घेण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ऑनलाईन परीक्षांसाठी ज्या कंपन्यांची निवड केली होती. मात्र परीक्षा योग्य पद्धतीने पार पडल्या नाहीत अश सर्व कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या कंपनीची क्षमता नसल्याने विद्यापीठ प्रशासन तोंडघशी पडलं व विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबत बोलताना सामंत म्हणाले कि , एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. विद्यापीठ परीक्षा हाणून पाडण्यासाठी सायबर हल्ला झाला का याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा योग्य पद्धतीने का होऊ शकल्या नाहीत यासाठी ४ सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपासून ही समिती काम करणार आहे. सीईटी परीक्षा तालुका स्तरावर कशी करता येईल याविषयी तयारी सुरू केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान राज्यभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षांचा फज्जा उडाला. मुंबई विद्यापीठातल्या आयडॉल विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यावरून विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. तर पुणे विद्यापीठांमध्येही परीक्षा योग्य पद्धतीने होऊ शकल्या नाही. तिथेही कुलगुरूंवर टीकेचा भडीमार झाला होता. विदर्भातल्या अमरावतीमधल्या विद्यापीठात तर तीन वेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यामुळे युवसेनाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या ऑफिसमध्ये राडा केला. कुलगुरूंची खुर्ची आणि इतर सामानांचीही तोडफोड केली त्यामुळे विद्यापीठात एकच गोंधळ उडाला. अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेचा पुरता गोंधळ उडालेला आहे विद्यापीठाला तिसऱ्यांदा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहे. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तीव्र संताप आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी प्रो मार्क या गुणवत्ता नसलेल्या कंपनीसोबत हातमिळवणी करून ऑनलाइन परीक्षेचा कंत्राट दिलं असा आरोप होत आहे.