MaharashtraCoronaUpdate : दिवसभरात आढळले ७३४७ नवे रुग्ण तर १३ हजार २४७ रुग्णांना डिस्चार्ज , उपचार दर ९० टक्केच्या जवळ

राज्यात आज दिवसभरात ७ हजार ३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या आणखी जवळ पोहचला असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे. दरम्यान, राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा (अॅक्टिव्ह रुग्ण) १ लाख ४४ हजारच्याही खाली आला आहे. दरम्यान गेल्या २४ तासात १८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून कोरोनाबाधितांचा मृत्यूदर सध्या २.६३ टक्के इतका आहे. आज सर्वाधिक ४८ करोना मृत्यूंची नोंद मुंबई पालिका हद्दीत झाली तर पुणे पालिका हद्दीत १६ जण दगावले. राज्यातील एकूण करोनामृत्यूंचा आकडा ४३ हजार १५ इतका झाला आहे.
राज्यातील करोना संसर्गाची लाट ज्या वेगाने वाढली त्याच वेगाने ओसरताना दिसत आहे. आज ७ हजार ३४७ नवीन रुग्ण आढळले असताना त्याच्या साधारण दुप्पट १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ४५ हजार १०३ रुग्णांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.५२ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ७९ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ३२ हजार ५४४ (१९.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या प्रत्यक्षात १ लाख ४३ हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वेगाने खाली आला असून सध्या पुणे जिल्ह्यात २६ हजार ८२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबई पालिका हद्दीत सध्या १७ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्यात आज ९०० करोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण बाधितांची संख्या २ लाख ५ हजार ४३४ वर पोहचली आहे. आज ९४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८७ हजार ९२३ इतकी झाली आहे. सध्या १२ हजार ३१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर दिवसभरात १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ५१९६ रुग्ण करोनामुळे दगावले आहेत.