MaharashtraNewsUpdate : चर्चेतली बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ” त्या ” पत्रावरून पुन्हा बोलले शरद पवार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रव्यवहाराची चर्चा चालूच आहे . दरम्यानच्या काळात यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांनी काही शब्द ” त्या ” पत्रात वापरायला नको होते अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा कोश्यारींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे कि , ‘स्वाभिमान असेल तर कोश्यारी यांनी पदावर राहायचं की नाही याचा विचार करावा’.
राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच, तुम्ही अचानक सेक्युलर कसे झालात, अशी विचारणाही केली होती. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही राज्यपालांच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. स्वतः शरद पवार यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं . यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपली प्रतिक्रिया देताना, कोश्यारी यांनी ही भाषा टाळायला हवी होती, असं म्हटलं होतं.
शरद पवार यांच्या तुळजापूर दौऱ्यात त्यांच्या पत्रकार परिषदेत जेंव्हा याविषयी पवारांना विचारण्यात आलं तेंव्हा त्यांनी कोश्यारी यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. ते म्हणाले कि , ‘१९५७ पासून मी महाराष्ट्राचे राज्यपाल पाहिलेत. इतकंच नाही तर १९६७ नंतरच्या प्रत्येक राज्यपालांशी माझा संबंधही आला. मात्र, अशी भूमिका कुणी कधी घेतली नव्हती. राज्यपाल पद हे देशातील अत्यंत महत्त्वाचं पद आहे. त्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचीही प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. तसं झालं नाही तर अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे,’ असं पवार म्हणाले. ‘देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात राज्यपालांची कानउघडणी केली ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे. गृहमंत्र्यांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर स्वाभिमान असेल तर कोश्यारी यांनी या पदावर राहायचं की नाही हा विचार करावा, असंही पवार म्हणाले. ‘गृहमंत्र्यांनी जाहीरपणे टीकाटिप्पणी केल्यानंतरही ते तिथं बसणार असतील तर ठीक आहे. ‘शहाण्याला शब्दांचा मार’ अशी एक म्हण आपल्याकडं आहे. मात्र, यातील तो शब्द इथे लागू होतो का हे माहीत नाही,’ असा टोला पवारांनी हाणला.