CoronaMaharashtraUpdate : राज्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार दर ८६ टक्क्यांच्या जवळ , २५० रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासात १० हजार २५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून बरे होऊन घरी जाणारी संख्या १४ हजार २३८ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट आता ८६ टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. राज्यात सध्या १ लाख ८५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण असून दररोज हा आकडा कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक वातावरण आहे. दरम्यान राज्यात आज २५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सर्वाधिक ४७ मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नवीन बाधित रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्यातील फरक वाढताच आहे. राज्यात आज १० हजार २५९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात १३ लाख ५८ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आज किंचित वाढून ८५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान राज्यात कोरोना चाचण्यांनी ८० लाखाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत एकूण ८० लाख ६९ हजार १०० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १५ लाख ८६ हजार ३२१ म्हणजेच १९.६६ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या प्रत्यक्षात १ लाख ८५ हजार २७० अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सध्या २३ लाख ९५ हजार ५५२ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर २३ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज आणखी २५० करोना मृत्यूंची नोंद झाली. त्यात सर्वाधिक सर्वाधिक ४७ मृत्यूंची नोंद मुंबई पालिका हद्दीत करण्यात आली. त्यानंतर पुणे पालिका हद्दीत आज २२ मृत्यू नोंदवले गेले. सांगली जिल्हा आणि नागपूर पालिका हद्दीत प्रत्येकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण करोना मृत्यूंचा आकडा आता ४१ हजार ९६५ इतका झाला असून राज्याता करोना मृत्यूदर सध्या २.६५ टक्के इतका आहे.