IndiaNewsUpdate : भूकेने आणि तापेमुळे मरण पावलेल्या चिमुकलीचे मानवाधिकार आयोगाने घेतली दखल, योगी सरकारला विचारला जाब

उत्तरप्रदेशात , आग्रा येथे एका पाच वर्षांच्या मुलीचा भूकेने आणि तापेमुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण माध्यमात प्रसिद्धझाले होते. या बाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला , राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (National Human Rights Commission-NHRC) एक नोटीस जारी करून खुलासा विचारला आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या नोटिशीत चार आठवड्यांत प्रशासनाकडून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल देण्याचे निर्देश दिलेत. तसेच भविष्यात या पद्धतीची क्रूर आणि बेजबाबदारपणाची दुसरी घटना होणार नाही यासाठी मुख्य सचिवांकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावेत असेही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान याबाबत प्रसिद्धी मध्यातून आलेल्या बातम्यांनुसार, कुटुंबातील कमावणाऱ्या सदस्याला क्षयरोग झाल्याने आग्रा येथे राहणाऱ्या पीडित कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील पाच वर्षीय मुलीला वेळेवर भोजन आणि उपचार मिळू शकले नाहीत. गेल्या आठवडाभरापासून घरात अन्नाचा कणही नव्हता त्यातच तीन दिवस तापानं फणफणल्यानंतर गेल्या शुक्रवारी तिचा मृत्यू झाला होता. आग्र्याच्या बरोली अहीर तालुक्यातील नागला विधिचंद या गावातील हे कुटुंब आहे.
दरम्यान देशातील गरिबांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सुरु असतानाही एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू भूक आणि आजारपणामुळे झाल्याचे वृत्त राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निदर्शनास येताच आयोगाने त्याची दखल घेतली आहे. गरीबांसाठी आणि गरजवंतांसाठी जेवण, निवारा आणि काम उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रतिबद्ध असल्याचं तसंच यांसाठी मजूर आणि कामगारांसाठी कायद्यावर काम करण्याचे वक्तव्य केलेले असताना या धक्कादायक घटनेतून वेगळेच वास्तव उघडकीस आल्याचेही आयोगाने आपल्या नोटिशीत म्हटले आहे. लॉकडाऊन दरम्यान सरकारनं गरीब, मजुसांसाठी अनेक योजना सुरू केल्याचाही उल्लेख आयोगाने आपल्या नोटीसमध्ये केला असून सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजना केवळ कागदावरच आहेत काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.