MaharashtraNewsUpdate : विठ्ठलाचे दरवाजे उघडण्यासाठी मोठ्या आंदोलनाचा निर्धार , प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व

लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंदिस्त असलेल्या विठ्ठलाचे दरवाजे उघडावेत या आग्रही मागणीसाठी वारकरी संप्रदायाने येत्या ३१ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. याबाबत प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील, अशा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. दरम्यान वारकऱ्यांच्या या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या लढ्याला बळ मिळणार असून हा संघर्ष तीव्र होईल अशी चिंचेआहेत. याबाबत आता सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान ‘देशी दारूची दुकाने आज उघडी आहेत, पण मंदिरे बंद आहेत, हे सरकार हिरण्यकश्यपूचं सरकार आहे,’ असं म्हणत वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. येत्या ३१ ऑगस्टला सरकारला जाग करण्यासाठी पंढरपूरला एक लाखाच्या जवळपास वारकरी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या पत्रकार परिषेदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचीही उपस्थित होती.
मी मुख्यमंत्री असतो तर …..
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , वारकऱ्यांमध्ये आता महात्मा गांधी जिवंत झाले आहेत आणि ते ३१ तारखेला ते आंदोलन करतील, ‘मी मुख्यमंत्री असतो तर कोरोना संपला असं जाहीर केलं असतं,’ ‘सरकारने अनलॉक प्रक्रिया केली नाही, तर लोकच अनलॉक करत आहेत. सरकारने लॉकडाऊन केलं, परंतु अनलॉक करण्याची चावी त्यांना सापडत नाही,’ असा टोलाही आंबेडकर यांनी सरकारला लगावला. एसटीमध्ये ई-पास लागणार नाही, परंतु खासगी गाडीला ई-पास लागतो, हा शासनाचा दुजाभाव आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. सरकारने ई-पास सक्ती रद्द करावी अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान २४ ऑगस्ट रोजी या पंढरपुरातील मंदिराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. सध्या पंढरपूर मध्ये २०३५ कोरोना रुग्ण असल्याने शासनाकडून मंदिर उघडण्यास परवानगी नाही . कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी सध्या बंद आहेत. सार्वजनिक नमाज , पूजा अर्चा , भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या वरून सर्वच धर्मीयांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे.