IndiaNewsUpdate : कोरोना संकटापासून ते सीमेवरील तणावापर्यंत राष्ट्रपतींचे भाष्य , वेळेवर योग्य उत्तर देण्याचा चीनला इशारा , जवानांना नमन

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित करताना कोरोना संकटापासून ते सीमेवरील तणावापर्यंत भाष्य केले. दरम्यान राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात वेळेवर योग्य उत्तर देण्याचा चीनला इशाराही दिला आणि सीमेवर शाहिद झालेल्या जवानांना नमनही केले. राष्ट्राला उद्धेशून राष्ट्रपती म्हणाले कि , “यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षीप्रमाणे स्वातंत्रदिनाचा सोहळा मोठ्या पद्धतीनं साजरा केला जाणार नाही. याचं कारणं स्पष्ट आहे. संपूर्ण जग अशा विषाणूचा सामना करत आहे ज्यानं आज सर्व जनजीवन विस्कळीत केलं आहे. तसंच सर्वप्रकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण केला आहे,” असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनला कठोर शब्दांत संदेश दिला. जर कोणीही अशांतता निर्माण केली तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाणार असल्याचंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भारत चीन सीमावादाचाही उल्लेख केला. “आज जेव्हा संपूर्ण जगासमोर एक सर्वात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे, त्यावेळी सर्वांना त्याचा एकत्रित सामना करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेजारी राष्ट्रानं त्यांच्या विस्तारवादी भूमिकेचा अवलंबक करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या सीमेचं संरक्षण करणाऱ्या आपल्या जवानांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं,” असंही राष्ट्रपती म्हणाले. भारतमातेच्या त्या सुपुत्रांनी देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. संपूर्ण देश गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नमन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती आदराची भावना आहे. जर कोणीही अशांतता पसरवण्याचं काम केलं तर त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल हे आपण दाखवून दिल्याचंही ते म्हणाले.