आई – वडिलांसोबत ‘ती’ बस पकडणारच होती पण…

उत्तर प्रदेशात इटावाह – मैनपुरी सीमेवर किश्नी भागात मंगळवारी सकाळी आई – वडिलांसोबत बस पकडण्याचा प्रयत्न करत असताना एका सहा वर्षाच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्देवी मृत्यू झाला. हे कुटुंब गुरुग्रामवरुन सीतापूर जिल्ह्यामध्ये जात होते.
टाइम्स ऑफ इंडियाने दिल्याल्या माहिती नुसार, हे कुटुंब तेरा स्थलांतरित मजुरांसोबत एका ट्रकमध्ये बसले होते. ट्रकमधून उतरल्यानंतर त्यांना मैनपुरी सीमेवरील एका बसमध्ये बसण्यास सांगण्यात आले. त्यावेळी हा अपघात घडला. मृत मुलीचे पालक आणि काही नातेवाईक सोमवारी गुरुग्रामवरुन चालत निघाले होते. त्यानंतर त्यांना एका ट्रकमध्ये लिफ्ट मिळाली. मंगळवारी सकाळी इटावाह-मैनपुरी सीमेवर पोलिसांनी ट्रकला अडवले. तिच्या वडिलांनी सागितले की, “बस पकडण्यासाठी आम्ही आमचे सामान घेऊन ट्रकमधून उतरत होतो, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने माझ्या मुलीला चिरडले”. मैनपुरी प्रशासनाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केल्यानंतर ते आता मुलीचा मृतदेह घेऊन गावी जात आहेत. दरम्यान, मैनपुरीचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले की, “आम्ही ट्रक आमच्या ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरुन ट्रक चालक पळून गेला. लवकरच त्याला अटक करू”
मृत मुलीचे वडिल दैनंदिन रोजंदारीवर काम करतात. “१५ मार्चला होळी झाल्यानंतर आम्ही गुरुग्रामला परत आलो. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे काम मिळत नव्हते. रोजच्या उत्पन्नावर आमचे घर चालते. या परिस्थितीत, गुरुग्राममध्ये राहणे कठिण झाले होते. त्यामुळे आम्ही सीतापूरला आमच्या मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला. घरी जाण्याचा आमचा उत्साह दु:खामध्ये बदलला” असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.