पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर संकल्पनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साद , पहा आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला . यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , महाराष्ट्रातील मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावं. इतके दिवस तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात आणि करोनाशी लढा दिला. आता जे उद्योग सुरु होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावं. घरात राहा आणि सुरक्षित राहा हे आपलं घोषवाक्य आहे. आता ग्रीनझोनमधल्या माणसांनी मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझ्या महाराष्ट्रासाठी पुढे यावे असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , “३१ मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाउनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असं तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का? जगात कुणाकडे करोनाचं उत्तर नाही. युद्ध नेहमी शस्त्राने लढलं जातं. मात्र इथे हातात शस्त्र नाही. अंतर ठेवणं आणि जिंकणं हे कठीण आहे. लॉकडाउन वाढवणं हे काही अंशी नक्कीच बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही संख्या वाढते आहे. मग आत्तापर्यंत काय केलं? हा प्रश्न पडलाच असेल. आपण मार्चपासून काळजी घेतो आहोत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवू शकलो आहोत. आपण करोनाची श्रृंखला मोडू शकलेलो नाही. मात्र लॉकडाउनच्या गतिरोधकाने आपण करोनावर नियंत्रण ठेवू शकलो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
“येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना संमती दिली आहे. ५ लाख मजूर यामध्ये काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबलं गेलं आहे. ज्यामुळे जग थांबलं आहे असंही ते म्हणाले आहेत. सरकारला ६ महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान लॉकडाउननंतर राज्यात जे नवे उद्योग येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखून ठेवत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. याद्वारे त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी नव्या उद्योगांना राज्यात येण्याचे आवाहन केले आहे. या बाबत आपली भूमिका स्पष्ट करताना , उद्धव ठाकरे म्हणाले, “जगात सर्वकाही ठप्प झालेल असताना उद्या आपल्याला भरारी घ्यायची आहे. त्याकडे आपण अजिबात मागे पुढे पाहणार नाही. आमच्या शासनानं सुरु केलेल्या नव्या योजना आम्ही आमलात आणणार म्हणजे आणणारच. नवीन उद्योग आणण्यासाठी सध्या देशात स्पर्धा आहे. कोण काय नवं देतंय याकडे सर्वांच लक्ष आहे. त्यामुळेच महराष्ट्रात आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नवीन उद्योगधंद्यांसाठी राखून ठेवत आहोत. त्याचबरोबर जे नवे उद्योजक परदेशातून राज्यात येतील किंवा आपलेच काही उद्योजक नवे उद्योग स्थापन करण्यासाठी पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. हे उद्योजक जर ग्रीन उद्योग सुरु करणार असतील तर त्यांना प्रदुषण होणार नाही या अटीशिवाय आपण कुठल्याही अटीतटी ठेवणार नाही.” नवीन उद्योजकांनो या महाराष्ट्रामध्ये या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
“ पुढचे काही दिवस हे नवे उद्योजक येणार असतील आणि त्यांना जमीन विकत घ्यायला परवडणार नसेल तरीही हरकत नाही. तुम्ही या तुम्हाला आम्ही भाडेतत्वार जमीन उपलब्ध करुन देऊ. उद्योगांसाठीच्या मुलभूत सुविधा तुम्हाला देतो. अटीतटीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. या राज्यात नवं उद्योग पर्व आपण सुरु करु,” अशी सादही मुख्यमंत्र्यांनी नव्या उद्योजकांना घातली आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “ग्रीन झोन आपल्याला करोनामुक्त ठेवायचा आहे. तसेच रेड झोनचं लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये रुपांतर करायचं आहे. अनेक ठिकाणी कामगारांची उणीव आहे. कारण अनेक कामगार निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भुमिपुत्रांना माझं आवाहन आहे की, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी जिथं ग्रीन झोन आहेत तिथं तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे. या उद्योगांना जर मनुष्यबळं कमी पडत असेल तर मोदींच्या भाषेत आत्मनिर्भत होत पुढे या इथं तुमची खऱ्या अर्थानं गरज आहे.”