PoliticsOfMaharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार बिनविरोध

कोरोनाच्या धामधुमीत बहुचर्चित विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरील गंडांतर टळले आहे . यावरून राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते . हा वाद राजभवनापासून थेट पंतप्रधानांपर्यंत आणि गृह मंत्र्यांपर्यंत गेला होता शेवटी निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन निवडणूक लावल्याने हा वाद आता मिटला आहे .
विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे. विधान परिषदेसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ नंतर संपली. त्यानंतर अधिकृत निकाल घोषित केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, राज्यावर करोनाचं संकट गहिरं झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्नशील होते. आता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्य विधी मंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य झाले आहेत. ते पहिल्यांदाच विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यानी नोव्हेंबरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ते राज्य विधी मंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे प्रतिनिधी नसल्यानं २७ मे २०२० पूर्वी त्यांना एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे होते.