#AurnagabadCoronaUpdate : धक्कादायक : औरंगाबाद १२० , संपर्कातील रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढली….

मुंबई , ठाणे, नागपूर आणि पुण्याच्या पाठोपाठ औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून काल दिवसभरात १०५ रुग्ण आढळल्यानंतर आज सकाळी पुन्हा ४ आणि पुन्हा ११ नवीन रुग्ण आढळल्याने औरंगाबादमधील करोना रुग्णांची संख्या १२० वर गेली आहे. आज सापडलेल्या ११ रुग्णांमध्ये नूर कॉलनीतील ९, गारखेडा, भीमनगर आणि भावसिंगपुरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा १२० झाला आहे. या सर्वांना संपर्कामुळे कोरोना झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वांच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात येत आहे. भीमनगर आणि भावसिंगपुरा या परिसरात रुग्ण वाढीची संख्या अधिक असल्याने हे परिसर आधीच सील केले आहेत.
दरम्यान, सोमवारी २७ एप्रिल रोजी दुपारपर्यंत येथील बाधितांचा आकडा ५३ होता. मात्र सोमवारी सायंकाळी एकाचवेळी २९ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितांचा आकडा ८२ झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १३ बाधित नव्याने आढळून आले. एकूण बाधितांचा आकडा ९५ झाला. त्यानंतर दुपारी साडेतीनला झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १० बाधित असल्याचे स्पष्ट झाले आणि बाधितांचा आकडा १०५ आणि आज सकाळी १० वाजेपर्यंत १६ नवीन रुग्ण आढळून आल्याने औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या १२० झाली आहे. हे सर्व बाधित किलेअर्क, पैठण गेट, भीमनगर-भावसिंगपुरा, दौलताबाद, संजयनगर, मुकुंदवाडी, बडा तकिया मशीद, सिल्लेखाना, भावसिंगपुरा, नूर कॉलनी, आसेफिया कॉलनी, काला दरवाजा आदी भागांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद प्रशासनाने काल शहरातील लोकप्रतिनिधी आणि मुस्लिम धर्मगुरू , नागरिक यांची बैठक घेऊन सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या आणि कुठेही गर्दी न करण्याच्या तसेच लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती करून कोणत्याही नागरिकाला काही त्रास असल्यास तात्काळ नजीकच्या फिवर क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय पोलीस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांनी शहरातील दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच परवानगी देऊन सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत कडक कर्फ्यूचे आदेश जारी केले आहेत.