#CoronaVirusUpdate : कोरोना संसर्गाच्या भीतीने मुख्यमंत्र्यांच्या “ट्रेन ” च्या मागणीला गडकरींच्या वाटाण्याच्या अक्षता…

राज्यात अडकलेल्या परराज्यातील कामगार, मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी स्पेशल ट्रेनची सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याचा आम्ही सन्मान करतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य ठरेल असे म्हणत त्यांनी मुंबईतून या परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी ट्रेन सोडली, तर कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठीची शिस्त पाळली जाईल का? याची तुम्ही गॅरंटी घ्याल का? स्टेशनवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवासी प्रवास करतील, हे शक्य आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
गडकरी पुढे म्हणाले कि , वांद्रे स्टेशन बाहेर काय झालं हे सर्वांनी पाहिलं. अशी ट्रेन सोडली आणि ट्रेनमध्ये गर्दी झाली, त्यानंतर दिल्लीच्या निजामुद्दीन कार्यक्रमातून कोरोनाचा प्रसार झाला, तसं काही घडलं तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे अशी स्पेशल ट्रेन सोडणे सध्यातरी अशक्य आहे. सध्याच्या स्थितीत असं करणे गंभीर आहे. त्यामुळे असा काही निर्णय घेणे अयोग्य ठरेल. पुढच्या काळात नक्की खबरदारी घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहे, ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का? याचा विचार केंद्र शासनाने करावा, एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.