#CoronaVirusUpdate : संचारबंदी झुगारून रस्त्यावर भटकणाऱ्यांना, फटक्याच्या प्रसादासह ७०० रुपये दंड आणि चारित्र्यावरही गालबोट !!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले संचारबंदी व जमावबंदीचे आदेश धुडकावून आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या आणखी १३ नागरिकांना न्यायालयाचे प्रत्येकी ७०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हे सर्व नागरिक हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. यापूर्वी एमआयडीसीत अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ११ नागरिकांना दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बजरंग काळे, बाबाराव दांडेकर, विजयकुमार यादव, सुधाकर धुरिया, अशोक शाक्य, अजमल खान, अजित बोपचे, वैभव दाभेकर, बलराज भगत, अमर गायकवाड, संतोष शाह, राजू पटले व घनश्याम खोब्रागडे अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत.
संचारबंदी व जमाबंदीदरम्यान हिंगणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल असलेल्या नागरिकांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दोषी आढळल्याने न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी ७०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षा झालेल्या नागरिकांना व्हिसा व शासकीय लाभ मिळण्यात अडचणी येणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे ८ रुग्ण आढळले
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी सात जण इतर राज्यांतील असून, एक जण यवतमाळ जिल्ह्यातील आहे. परराज्यांतील सात करोनाबाधितांपैकी चार उत्तर प्रदेशचे, दोन पश्चिम बंगालचे, तर एक दिल्लीचा आहे. हे सातही जण तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. तर पॉझिटिव्ह असलेला आठवा रुग्ण हा या सात जणांच्या संपर्कात आला होता.
दरम्यान विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत एकूण ६५ जण भरती आहेत. यापैकी ५१ जणांचे अहवाल महाविद्यालयाला प्राप्त झाले. १४ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकाच्या घराशेजारील भाग कंटेन्मेंट (प्रतिबंधित) करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे कुटंबीय, ते ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांची संख्या ८९ आहे.