भाजपची तिन्हीही तिकिटे गेल्यानंतर संजय काकडे म्हणाले , ” मला दिल्लीत करमत नाही…राज्यसभेवर जाण्यात मला काहीही रस नव्हता…”
महाराष्ट्रातून भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल असा विश्वास बाळगणाऱ्या संजय काकडे यांनी उदयन राजे , रामदास आठवले आणि डॉ. भागवत कऱ्हाड यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर आता मात्र ” मला डावलण्यात आलेलं नाही तर राज्यसभेवर जाण्यात मला काहीही रस नव्हता. दिल्लीत जाण्याची इच्छा नाही आणि मला तिथे करमणार नाही असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे. मला राज्यात चांगली जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मला राज्यात काम करायला आवडेल. जी जबाबदारी मिळेल ती स्वीकारायला तयार आहे. आठ ते दहा जण इच्छुक होते, मीही सहयोगी होतो. त्यामुळे पक्षाने जुन्या कार्यकर्त्याला संधी देण्यात येत आहे. असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. दुःख याचं आहे की एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांना द्यायला हवी, त्यांच्यावर अन्याय झाला.
दरम्यान भाजपाकडून राज्यसभेसाठीचं तिसरं तिकिट मलाच मिळेल असा दावा संजय काकडे यांनी केला होता. ते न मिळाल्याने संजय काकडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण नाराज नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही आपण नाराज नाही हेदेखील त्यांनी सांगितलं. तसंच दिल्लीत जाण्यात आपल्याला काहीही रस नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.