Aurangabad : चंद्रकांत खैरे यांना राज्यसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांची नावे असताना काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. येत्या २६ मार्चला राज्यसभेची निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना कुणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती.
दरम्यान औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाल्यानंतर औरंगाबाद पालिका निवडणुका आणि एमआयएमच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खैरेंना शिवसेना राज्यसभेत पाठवले जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती , मात्र, शिवसेनेने खैरे आणि रावते यांचा पत्ता कट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यसभेच्या या एका जागेसाठी रावते, खैरेंपाठोपाठ शिवाजीराव आढळराव पाटील आणि अनंत गीते यांचीही नावं चर्चेत होती. मात्र या सर्वांना डावलून शिवसेनेने चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे.
काही महिन्यांपूर्वीच प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या आहेत. त्यांचं हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्यामुळे त्या दिल्लीत शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडू शकतात. त्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करता येईल, या हेतूने शिवसेनेने चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय त्याही राज्यसभेत जाण्यासाठी त्या स्वतः इच्छूक होत्या, त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंगही लावली होती. तसेच राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे होत्या. अखेर त्यांनाच तिकीट जाहीर झालं आहे. दरम्यान शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीला काहीही महत्व नसले तरी धुसपूस मात्र जाणवत आहे.