वंचित बहुजन आघाडीची उद्या दिल्लीत रॅली , मायावतींना प्रकाश आंबेडकरांचे खुले निमंत्रण….
वंचित बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना खुले पत्रं लिहिलं आहे. या खुल्या पत्रात त्यांनी उद्या दिल्लीत होणाऱ्या वंचितच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी रॅलीत उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची विनंती मायावतींना केली आहे. आंबेडकर यांनी पहिल्यांदाच मायावतींना पत्रं लिहून आंदोलनात भाग घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या रॅलीच्या निमित्ताने आगामी काळात मायावतींसोबत मिळून दलित राजकारणाची मोट बांधण्याच्या आंबेडकरांनी हालचाली सुरू केल्या असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीने एनपीआर, एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ४ मार्चे रोजी सकाळी १० वाजता दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर देश बचाओ, संविधान बचाओ रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीचं एका विशाल सभेत रुपांतरही होणार आहे. ही रॅली अधिक व्यापक करण्यासाठी केंद्र सरकारपर्यंत आपला रोष व्यक्त करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी थेट बसपा सुप्रिमो मायावती यांना खुले पत्रं लिहून त्यांना रॅलीला येऊन मार्गदर्शन करण्याचे साकडे घातले आहे. या पत्रात आंबेडकर यांनी मायावती यांची वरेमाप स्तुतीही केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहात. तुमची मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीची आजही बहुजन जागरण युग म्हणून आठवण केली जाते, अशी स्तुती आंबेडकर यांनी केली आहे. सध्या देशातील राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडली आहे. सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या माध्यमातून केंद्र सरकार बहुजनांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या संविधानविरोधी कायद्याच्या एकाच माऱ्याने येथील बहुजन अधिकारांपासून वंचित होणार आहेत. यातील बहुतेक लोकांना कायमस्वरुपी डिटेंशन सेंटरमध्ये टाकले जाईल. त्यामुळे उद्या आम्ही या कायद्याविरोधात आयोजित केलेल्या रॅलीला येऊन तुम्ही मार्गदर्शन करा. तुमचा प्रशासकीय अनुभव मोठा असल्याने हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा, असं आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.