देवेंद्र फडणवीस यांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
विधानसभा निवडणूक शपथपत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांविरोधातील फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात आता खटला सुरु होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये या प्रकरणावर प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या प्रकरणाचे तक्रारदार सतीश उके यांनी दाखल केलेल्या अर्जात , देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याविरूद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडपून ठेवली, अशी तक्रार केली होती. तेव्हा फडणवीस यांनी त्याला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. पण, सत्र न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया करण्याचा आदेश दिला. त्या आदेशाला फडणवीस यांनी हायकोर्टात आव्हान दिले. त्यावेळेस हायकोर्टाने उके यांची तक्रार फेटाळून लावली होती. त्या निर्णयाला उके यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानुसार डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया सुरू करून फडणवीस यांना समन्स बजावला. परंतु तीनदा फडणवीस यांनी न्यायालयाला अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली. ती मंजूर झाली होती. मात्र, तक्रारकर्त्याने त्यावर आक्षेप घेतला होता.