…..ये मोदी और मेरे अंदर की बात है !! केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सभेत शेअर केली हि माहिती
केंद्रात जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत मी राहील व जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी राहतील. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असे उद्गार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले आहेत. आठवलेंच्या या गमतीशीर विधानाने उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ईदगाह मैदानावर झालेल्या अभिवादन सभेमध्ये आठवले बोलत होते. काँग्रेस मुस्लिम बांधवांना भडकावण्याचे काम करीत असल्याचा आरोप आठवले यांनी केला. पाकिस्तान भारतापासून वेगळा व्हायला नको होता. इंग्रजांनी ही मोठी चूक केली. त्यामुळे दहशतवाद वाढल्याची टीकाही त्यांनी केली. विविध धर्म आणि जातींच्या लोकांनी एकमेकांशी वाद करू नयेत. आपसात संघर्ष करू नये, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केले आहे. हे संविधान पवित्र असून, डॉ. आंबेडकरांच्या संविधानातील भारत उभा करायचा आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना आठवले पुढे म्हणाले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता विरोधी पक्षांना पाहवत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेतची मोदींची मैत्री विरोधकांना खटकत आहे. मोदींच्या परदेशांतील सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, त्यामुळेही विरोधक आणि विशेषत: काँग्रेसला अधिक त्रास होत आहे. म्हणूनच विरोधकांचा तोल जात आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. एनआरसी कायदा मुस्लिमविरोधी नाही. देशातील मुस्लिमांच्या नागरिकत्वाला आव्हान देणारा नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मुस्लिम बांधवांना नागरिकत्व टिकविण्यात अडचण आली, तर मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही आठवले यांनी यावेळी दिली.
डॉ. आंबेडकर यांनी मंदिरात प्रवेश मिळावा याकरिता काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन सुरू केले. पाणी मिळावे म्हणून महाड येथे चवदार तळ्याचे आंदोलन सुरू केले. गावाची व्यवस्था कामावर आधारित होती. परंतु, माणसाने ती वर्णावर आधारित केली. संविधानातून देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले. त्यामुळेच त्यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, काकासाहेब खंबाळकर, प्रियकीर्ती त्रिभुवन, बाबूराव कदम, सुरेखा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.