चर्चेतली बातमी : एल्गार परिषदेचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम , राज्य सरकारचा कोर्टात युक्तिवाद , उद्या पुन्हा सुनावणी

पुण्यातील बहुचर्चित भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी राज्य सरकार आणि मोदी सरकारमध्ये संघर्ष तीव्र झाला असून राज्य सरकारच्या वतीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम असून कुठल्या एजन्सीची गरज नसल्याचा युक्तीवाद केला आहे. या प्रकरणी उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
पुण्यात झालेल्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद आणि हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्राने एनआयए अर्थात राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (National Investigation Agency ) कडे सोपवल्यामुळे मोदी सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे एनआयएने या प्रकरणाचा तपास ताब्यात घेण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आतापर्यंत एल्गार प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत होते. आता हा तपास एनआयएकडे येण्यासाठी केंद्र सरकारने राज्य गृहमंत्रालयाकडे अर्ज केला होता. मात्र, या अर्जावर कुठलाच निर्णय न घेतल्याने एनआयएने दुसरा मार्ग निवडला आणि कायदेशीर लढाई करण्यासाठी पुणे सत्र न्यायालायात अर्ज दाखल केला. परंतु, आज कोर्टात राज्य सरकारने युक्तीवाद करत एनआयएकडे तपास देण्यास कडाडून विरोध केला.
दरम्यान एल्गार परिषदेचा तपास करण्यासाठी राज्याची पोलीस यंत्रणा सक्षम आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कुठल्याही दुसऱ्या एजन्सीची गरज नाही, अशी भूमिका राज्य सरकारने पुणे सत्र न्यायालयात मांडली. त्यामुळे आता एल्गार परिषदेच्या तपासावरून राज्य विरुद्ध केंद्र सरकाराचा संघर्ष न्यायालयात आणखी तीव्र होणार आहे. या प्रकरणी उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.