Aurangabad : उपचारादरम्यान रुग्ण दगवल्याने घाटी रुग्णालयात नातेवाईकांकडून आयसीयूत वार्डात तोड -फोड

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्णांच्या नातेवाईकांनी राडा घातला. रुग्णालयात ३० ते ४० नातेवाईकांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपचारादरम्यान रुग्ण दगवल्याचे कळताच काही संतप्त नातेवाईकांनी घाटी रुग्णालयाच्या मेडिसिन विभागातील आयसीयू वॉर्ड मध्ये धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
उपचारादरम्यान रुग्ण दगवल्याचे कळताच बाहेर उभे इतर नातेवाईक देखील आयसीयूत दाखल झाले व त्यांनी देखील आरडाओरड करीत सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली. परिचारिका कक्ष, तसेच मेडिसिन विभागाचा दरवाजा तोडत धिंगाणा घातला. या प्रकरणी घाटी प्रशासनाच्या वतीने बेगमपुरा पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रकिया चालू होती. या आधीही घाटी रुग्णालयात तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात अशा घटना कायम घडत असतात. त्यांच्या विरुद्ध डॉक्टरांनी अनेकदा आंदोलनही केली होती. डॉक्टरांना मारहाण करणं, त्रास देणं अशा घटनांविरुद्ध उपायोजना कराव्यात अशी मागणी वारंवार केली जाते. मात्र त्यावर तात्पुरते उपाय केले जातात. काही दिवस शांततेत गेल्यानंतर पुन्हा अशा घटना घडतात त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.